
मुंबई : शिवसेना (ठाकरे) पक्षाची जवळजवळ काँग्रेसच झाली आहे. जे पदाधिकारी काम करीत नाहीत, ते नाराज होऊ नयेत म्हणून त्यांना दुसरे पद दिले जाते. त्यांना पदावरून हटविण्याची हिंमत आमच्यामध्ये नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधव यांनी ही नाराजी व्यक्त केली.
शाखाप्रमुख वगैरे पदांचा कालावधी निश्चित केला पाहिजे. तरच त्यांच्यामध्ये काम करण्याची स्पर्धा लागेल. काही पदाधिकारी दहा-दहा पंधरा-पंधरा वर्षांपासून एका जागेवर बसलेले आहेत. माझ्या पदाला कुणी हात लावू शकत नाही, असता त्यांचा समज झालेला आहे. शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांचा कार्यकाळ निश्चित करा, असा सल्ला भास्कर जाधव यांनी विनायक राऊत यांना दिला आहे.
शिंदे गटाचे निमंत्रण
जाधव यांनी असे विधान करताच शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना थेट पक्षात येण्याचा प्रस्ताव देण्यात आला. उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी जे भास्कर जाधव आता बोलले ते आम्ही अडीच वर्षांपूर्वी केले. ते वरिष्ठ नेते आहेत. ते मोठे नेते आहेत, आमच्या पक्षात आले तर आवडेल, असे सामंत यांनी सांगितले.



