पुणे : ‘पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी बाधित शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांत संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे,’ असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘बाधित सात गावांतील शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, परस्पर जमिनींची विक्री करू नये. नक्कीच त्यांना योग्य मोबदला मिळेल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.
पुरंदर विमानतळ जुन्याच जागी होणार असल्याचे स्पष्ट करून भूसंपादनाबाबत कार्यवाही सुरू करण्यासाठी संवाद साधण्यासाठी सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘पुरंदर विमानतळासाठी दोन हजार ८०० हेक्टर भूसंपादन करावे लागणार आहे. महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) २०१३ च्या कायद्यानुसारच शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वेच्छेने सहमती दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपटींनी मोबदला देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. जमिनीची मोजणी, बागायती, जिरायती क्षेत्र, नैसर्गिक स्राोत, विहीर, झाडे, फळझाडे आदींनुसार मोबदला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
संवाद नसल्याने चुकीच्या भूलथापांना बळी पडल्याचे दिसून आले आहे. मात्र, अनेक शेतकरी स्वत:हून किती मोबदला मिळणार आदी चौकशी करून सहमती दर्शविण्यासाठी तयार असल्याचेही अधोरेखित झाले आहे. आतापर्यंत चार गावांत बैठका घेऊन स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. तर येत्या आठवडाभरात उर्वरित तीन गावांतील शेतकऱ्यांबरोबर बैठका घेऊन संवादाची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर फेरसर्वेक्षण आणि मोजणी प्रक्रिया पूर्ण करून येत्या सहा महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल,’ अशी ग्वाही डुडी यांनी दिली.




