पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २०२९ ला मतदारसंघाची पुनर्रचना होण्याची शक्यता असून, शहरात पाच विधानसभा मतदारसंघ होतील, असे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सांगितले.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत असल्याने मतदारसंघाची संख्याही वाढणार आहे. २०२९ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यास पिंपरी-चिंंचवडमध्ये पाच मतदारसंघ होण्याची शक्यता आहे.’
दरम्यान, सध्या शहरात पिंपरी, चिंंचवड आणि भोसरी हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. पुनर्रचना झाल्यास त्यामध्ये आणखी दोन मतदारसंघांची भर पडण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणीचा मोठा हातभार
लोकसभेला महाविकास आघाडीचे ३३ खासदार निवडून आले. तेव्हा गडबड झाली नाही. विधानसभेला दारुण पराभव झाला, की मतदान यंत्रांमध्ये गडबड झाली, असे कुठे असते का? असा सवाल करून पवार म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत काही तरी वेगळे केल्यामुळे महायुतीचे सरकार आले, असे बोलले जाते. पण, महायुतीचे सरकार येण्यात लाडक्या बहिणीचा मोठा हातभार आहे. कोयता गँग सहन केली जाणार नाही. कायदा-सुव्यवस्था चांगली ठेवली पाहिजे. पोलिसांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत.’
पर्यावरणप्रेमींशी चर्चा
‘जागतिक तापमानवाढीचे संकट असल्याने वृक्षतोड रोखायला हवी. नदी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. मुळा नदीकाठच्या वृक्षतोडीबाबत आणि नदीसुधारबाबत पर्यावरणवादी यांचे मत जाणून घेतले जाईल. महापालिका, जलसंपदा आणि पर्यावरणप्रेमींसोबत बैठक घेतली जाईल. त्यानुसार प्रकल्प राबविला जाईल, असेही पवार यांनी सांगितले.
विलास लांडे ‘तळ्यात-मळ्यात’
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे यांचा प्रचार करणारे माजी आमदार विलास लांडे नेमक्या कोणत्या पक्षात आहेत, याबाबत लोक मला विचारतात. सर्वच म्हणतात लांडे आपलेच आहेत. मात्र, सर्वपक्षीय राहिल्यामुळे त्यांना काहीच मिळत नाही. त्यामुळे काही तरी भूमिका घ्यावी लागते. लांडे यांचे तळ्यात मळ्यात सुरू असते. एकनिष्ठ राहणारे बनसोडे कोठे गेले हे बघा, असे सांगत लांडे यांना भूमिका घेण्याची सूचना पवार यांनी केली.
‘चिरंजीवाला समजावून सांगा’
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची मूर्ती लहान, पण कीर्ती महान आहे. आता सकाळी लवकर कामाला लागा, लोकांना वेळ द्या, विधानसभेला वेळ द्यावा लागेल. जेवढे महत्त्वाचे पद, तेवढे जास्त कष्ट घ्यावे लागतात. तुमच्या चिरंजीवाला जरा समजावून सांगा. घरातील व्यक्तीने चुकीचे कृत्य केल्यास स्वत:ची, पक्षाची, सरकारची बदनामी होते, असा सल्ला पवार यांनी बनसोडे यांना दिला.




