रत्नागिरी : गुरुवारी दुपारच्या वेळेत येथील शासकीय विश्रामगृहात चक्क नारायण राणे यांनी निधीसाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क केला. ‘‘राणे, तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन; पण, फक्त सावंतवाडीतून बोलतोय असे सांगा,’’ असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले.
राजकीय वर्तुळात धक्कादायक ठरू शकणारा हा प्रकार घडला रत्नागिरीत. फक्त फरक एवढाच होता की, मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणारे सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सदस्य नारायण राणे आहेत
मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद साधारण सतरा वर्षे रंगत आहे. राणे भाजपमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री झाल्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे. गेल्या काही महिन्यांत तर या वादाने टोक गाठले आहे. अशा पार्श्वभूमीवर नारायण राणे शिवसेनेच्या राज्यातील मंत्र्याची निधीसाठी भेट का घेतील? मुख्यमंत्र्यांशी फोनवर का बोलतील? पण हे गुरुवारी रत्नागिरीत घडले. फक्त ‘हे’ राणे ‘ते’ राणे नव्हते.



