सांगली : पंतप्रधानांच्या मागील पुणे दौऱ्यातील पुणे महानगर पालिकेच्या कार्यक्रमात काही व्यक्तींना खडे बोल सुनावल्याने भाजपाने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची धास्ती घेतलेली दिसत आहे. म्हणूनच अजितदादा पवार यांना षडयंत्र करून आज देहू येथील कार्यक्रमात बोलू दिलेले नाही. राज्यातील सर्वाधिक महत्वाच्या पदावरील व्यक्तीचा अपमान हा पर्यायाने महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आणि भाजपाला टोलाही लगावला.
श्री संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंगळवारी दिनांक १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांचे लोहगाव विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर देहू येथे झालेल्या लोकार्पण कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर अजित पवारही उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमात अजित पवार यांना बोलण्याचा मान दिला नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. असं नक्की का घडलं असावं, याचं कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले



