मुंबई : राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या अंतिम टप्प्यात भाजपाने धक्कातंत्राचा अवलंब केला. मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी राजभवनात पार पडला. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेवर त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा भाजपाचा उद्देश स्पष्ट झाला असला तरी फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आल्याने पक्षनेते बुचकळ्यात पडल्याचं चित्र दिसून आले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी ‘देवेंद्र फडणवीसांचा बळी भाजपाने का दिला?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच आमची सहानुभूती फडणवीसांसोबत असल्याचंही आंबेडकरांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
प्रकाश आंबेडकरांनी चंद्रकांत पाटील यांना उपमुख्यमंत्री करता आलं असतं असं म्हटलं आहे. तसेच चंद्रकांत पाटील हे मागील सरकारच्या कालावधीमध्ये उपमुख्यमंत्र्यांप्रमाणे काम करत होते. त्याप्रमाणे ते केंद्रीय गृहमंत्री आणि माजी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या जवळचे असल्याचं सांगत आंबेडकर यांनी असं असतानाही फडणवीसांना का उपमुख्यमंत्री करण्यात आलं अशा अर्थाचं ट्विट केलं आहे.



