मुंबई : विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केल्याने ते अध्यक्ष बनले. यावेळी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून शक्तीप्रदर्शन केले. अध्यक्षपदासाठी भाजपाचे राहुल नार्वेकर यांच्याविरोधात शिवसेनेचे राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये नार्वेकर याना १६४ मते तर महाविकास आघाडीचे साळवी यांना १०७ मतदान झाले.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार रविवार आणि सोमवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.



