मुंबई: संकटं येतात तर ती एकटी येत नाहीत. चोहोबाजूने येतात. त्यामुळे मोठा फटका तर बसतोच, पण त्या संकटातून सावरणं कठिण होत असतं. संकटाचा काळ हा खऱ्या अर्थाने कसोटीचा काळ असतो. या काळात तुम्ही कसे उभे राहता आणि अशा काळात कसे निर्णय घेता यावर सर्व काही अवलंबून असतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबतही असंच काहीसं घडताना दिसत आहे. 40 आमदारांनी बंड करून भाजपसोबत हातमिळवणी केली. या बंडखोर आमदारांसोबत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यही गेले आहेत. एवढ्या मोठ्या बंडानंतर शिवसेनेला मोठा हादरा बसला. त्यामुळे राज्यातील सत्ता गेली.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता तर शिवसेनेवरच बंडखोरांनी दावा सांगितल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे थोडं होतं की काय आता खासदारांनीही भाजपशी जुळवून घेण्याची हाकाटी पक्षप्रमुखांकडे लावली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहनच खासदारांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेला आता भाजपशी जुळवून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. शिवसेनेने भाजपशी जुळवून घेणं कसं गरजेचं आहे, यावरही आता चर्चा सुरू झाली आहे.
पक्षाची मान्यता वाचवण्यासाठी
शिंदे गटाच्या बंडखोरांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेला अनेक शह दिले आहेत. शिंदे गटाला गटनेतेपद मिळालं आहे. तसेच शिंदे गटाच्या पक्षप्रतोदपदालाच मान्यता मिळाली आहे. आता शिंदे गटाकडून आपणच खरी शिवसेना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी आता शिंदे गटाकडून पक्षाच्या चिन्हावर दावा करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी आणि शिवसेनेचं नेतृत्व ठाकरे घराण्याकडेच असल्याचं दाखवण्यासाठीही शिवसेनेला भाजप सोबत जुळवून घ्यावं लागणार आहे. भाजपशी जुळवून घेतल्यास खासदार शिवसेनेतच राहतील. शिवाय बंडखोर आमदारही शिवसेनेत येतील. त्यामुळे पक्ष वाचेल आणि सत्ताही मिळेल.
खासदार सोबत ठेवणं गरजेचं….
40 आमदार पक्षाला सोडून गेले आहेत. विधानसभा निवडणुकांना अजून अडीच वर्षावर आहेत. अडीच वर्ष हा मोठा काळ आहे. या काळात पक्ष वाढवणे हे सर्वात मोठं आव्हान शिवसेनेसमोर आहे. त्यामुळे खासदारांनी बंड करू नये म्हणून शिवसेनेला भाजपशी जुळवून घेणं महत्त्वाचं आहे.



