पुणे : सत्ताधारी मंडळी सर्वसामान्यांचे सरकार आहे, असं सांगत आहेत. परंतु त्यांनी सर्वसामान्यांसाठी काही केलेलं दिसेना. दसऱ्याच्या मेळाव्याला ते म्हटले की माणसं स्वत:हून आली होती. मग त्यांच्या भाषणात लोक खुर्च्या सोडून का गेले?, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. माझ्या सोमेश्वरच्या सभेत शेवटच्या रांगेतील एकसुद्धा माणूस उठला नाही. कारण मी गद्दारी करुन आलेलो नाही, असं अजित पवार म्हणाले.
नुकत्याच पार पडलेल्या दसऱ्या दिवशी दोन ठिकाणी झालेल्या दसरा मेळाव्यातून बीकेसी मैदानावर झालेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा सुरु असताना काही शिंदे समर्थक सभेतून परत जात असताना दिसले. या घटनेचा संदर्भ देत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं.
राज्यापुढे अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना त्याविषयी कोणी बोलायला तयार नाही. राज्यात फक्त हे त्यांना आणि ते यांना गद्दार म्हणत आहेत. दोघांनी एकमेकांना गद्दार म्हटल्याने महाराष्ट्राचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल देखील पवारांनी केला. पवार यांच्या भाषणावेळी तुमच्याकडेच पुन्हा सत्तेची सूत्रे येतील, असं एका कार्यकर्त्याने म्हटले. त्याचा धागा पकडत पवार म्हणाले, अरे आम्ही येऊ, पण त्यासाठी आकडा पक्का लागला पाहिजे. १४५ आकडा गाठला पाहिजे. मी बहुमताच्या आकड्याविषयी बोलतोय, मटक्याच्या नव्हे, हे सांगायलाही पवार विसरले नाहीत. बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील शेतकरी मेळाव्यात अजितदादा बोलत होते.



