मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांसाठी आदेश काढला आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडी, केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निर्णय, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची न्यायालयीन लढाई या सारख्या मुद्यांवर पक्षाच्या सैनिकांनी कोणतीही भूमिका मांडू नये, असं राज ठाकरेंची मनसैनिकांना ‘वॉर्निंग’ ठाकरेंनी दिली आहे.
सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या चिन्ह आणि नावाबद्दल निर्णय घेतल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यावर भाष्य केलं होतं. मनसेचे आमदार राजू पाटील, नवी मुंबईतील नेते गजानन काळे आणि संदीप देशपांडे यांनी भूमिका मांडली होती. मात्र, आता राज ठाकरेंनी स्वत: सर्व मनसेसैनिकांसाठी सीमा रेषा आखली आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर काही बोलू अथवा लिहू नका, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. “सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन, असं राज ठाकरेंनी म्हटलंय”. त्यामुळं आता जेव्हा राज ठाकरे बोलतील तिचं मनसेची अधिकृत भूमिका असेल ते स्पष्ट झालं आहे.



