मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आज मुंबई येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही निवडणूक साधारणतः दीड वर्षांच्या कालावधीसाठी आहे. आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. भाजपाचे श्री. पटेल यांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्या प्रसंगी मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी स्वतः भूमिका घेतली होती की, गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातील कोणी उमेदवार उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उमेदवार उभा करणार नाही. तसा निर्णयही घेतला. प्रामाणिकपणे असे वाटते स्व. रमेश लटके यांचे महानगरपालिका आणि विधिमंडळातील योगदान व निवडणूक निवडून येणाऱ्या प्रतिनिधीचा कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल व महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून देण्यात यावे असे आवाहन करतो असे पवार यांनी म्हटले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही भूमिका मांडली, मात्र भाजप मात्र निवडणुकीतून माघार घेण्यास तयार होत नाही. प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तक्रार करण्याचे काही कारण नाही.
या पूर्वीही महाराष्ट्रात पोटनिवडणूक झाल्या त्यावेळी अशी भूमिका घेण्यात आली नाही. याचे कारण आताची ही निवडणूक दीड वर्षासाठी होत आहे. यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे वर्षा-दीड वर्षासाठी निवडणूक घेणे टाळता येईल तर बरे होईल. गोपीनाथ मुंडे यांच्यावेळी पोटनिवडणूक घेण्यात आली तेव्हा पावणे पाच वर्षांचा कालावधी होता.
अंधेरी पोटनिवडणुकीबाबत मी सर्व परिस्थितीचा विचार करत होतो. अर्ज मागे घेण्यासाठी अजून कालावधी आहे. त्या पूर्वी ही भूमिका मांडली आहे. महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केला नाही. त्यांना कोर्टात जावे लागले. मुंबई महानगरपालिकेने वेळीच योग्य निर्णय घेतला असता तर त्यांना कोर्टात जाण्याची वेळ आली नसती. परंतु वेगळी भूमिका मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे कोर्टात जावे लागले. कोर्टाने निर्णय देऊन मुंबई पालिकेला योग्य संदेश देत योग्य रस्ता दाखवला.
बीसीसीआय आणि एमसीए निवडणूक होत आहेत. खेळामध्ये आम्ही कोणी राजकारण आणत नाही, राजकीय भूमिका घेत नाही. ज्यावेळी मी बीसीसीआय अध्यक्ष होतो तेव्हा नरेंद्र मोदी हे सुद्धा मीटिंगला उपस्थित राहायचे. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. एमसीए ही चांगली संघटना आहे. देशामध्ये राज्य संघटना म्हणून एमसीए ही प्रभावी संघटना म्हणून कार्यरत आहे. या संघटनेचे साधरणतः ४०० सदस्य असतील पण ते कोणीही राजकारण यामध्ये आणत नाहीत.
हिमाचल प्रदेशाची निवडणूक लागली पण गुजरातची निवडणूक लागली नाही. आम्हाला आश्चार्य आहे की, निवडणूक आयोगाने सगळ्यांच्या निवडणुका एकत्र घेतल्या असत्या तर निवडणूक आयोगाच्या कामाबाबत ज्या शंका घेतल्या जातात, त्या शंका घेतल्या गेल्या नसत्या. निवडणूक आयोग ही स्वतंत्र मताची अशी संस्था आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या बाबत कोणती शंका उपस्थित होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. तशी जबाबदारी निवडणूक आयोग व प्रशासनाची सुद्धा आहे.



