मुंबई : : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यामूळे राज्यात ‘मविआ’च्या एकीची ‘मशाल’ पेटणार असून ठाकरे-पवार भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याने राज्यात नवीन समीकरण दिसणार आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे तर सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली.
राहुल गांधी यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उभय नेत्यांना दिले. दोहोंनीही हे निमंत्रण स्वीकारले असून, शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले.



