औरंगाबाद : महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळं होणाऱ्या वादांची मालिका सुरुच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यामुळं निर्माण झालेला वाद नवीन असताना अजून एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे. चंद्रकांत पाटील पैठणमधील एका कार्यक्रमात बोलते होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाटील यांच्यावर टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
“सरकारवर अवलंबून का राहताय? या देशात शाळा सुरु कुणी केल्या, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरु केल्या. महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली मला पैसे द्या, आता त्या काळी १० रुपये देणारे होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत ना?”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले
.
आता सीएसआर ज्याला म्हणतो, कंपनीच्या नफ्याच्या २ टक्के खर्च केली जाते, ५ कोटींपेक्षा अधिक नफा असलेल्या कंपन्यांना निधी सामाजिक कामासाठी खर्च करावा लागतो, हा कायदा झाला आहे. आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागू पण मंदिरं ज्यावेळी उभी करतो त्यावेळी सरकारकडे पैसे मागतो का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.



