कराड : कराड तालुक्यातील कराड दक्षिण, कराड शहर व कराड उत्तर काँग्रेस कमिटी च्या #HaatSeHaatJodo अभियान चा शुभारंभ माजी मंत्री आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
भाजपाच्या हुकूमशाही कारभारामुळे संविधान, लोकशाही अन् देश धोक्यात आला आहे. पुन्हा जातीभेदावर आधारित व्यवस्था आणण्याचे काम होत असल्याने या विरुद्ध गाफील न राहता सर्वांनी मिळून स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची ही वेळ असल्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
आमदार सतेज पाटील, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले की, गौतम अदानी यांच्या मायाजालाचे पुरावे जगजाहीर झाल्यामुळे अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मैत्रीतून देश विकला जात असल्याच्या संशयाचे चित्र निर्माण झाले आहे. एक सामान्य उद्योजक असलेले अदानी सर्वाधिक श्रीमंत उद्योजक झाले कसे? असा सर्वांचा प्रश्न आहे. तर, अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेने अदानींच्या मायाजालाचे पुरावे जगजाहीर केल्याने काँग्रेससह विरोधकांनी केलेल्या मागणीनुसार या सर्व प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी केली जावी आणि म्हणूनच उद्या काँग्रेसकडून देशभर आंदोलन छेडले जाणार आहे.
सतेज पाटील म्हणाले, की एकतर्फी ‘मन की बात’ न करता लोकांच्या मनातील बात ऐकायला राहुल गांधींनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. आता लोकांनी ‘हाथ से हाथ जोडो’च्या माध्यमातून आणखी बळ द्यावे. कार्यक्रमात अॅड. उदयसिंह पाटील, शिवराज मोरे आदींची भाषणे झाली. दरम्यान, ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान शुभारंभापूर्वी काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळाला.



