मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा तिसरा दिवस आहे. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी हे युक्तिवाद करत आहे. मात्र, महेश जेठमलानी युक्तिवाद करत असताना न्यायालयाने जेठमलानी यांना मध्येच थांबवले. राज्यातील सत्ता संघर्षावरती मोठी उलथापालथ होणार का? याकडे तमाम महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले न्यायालय….
युक्तिवाद सुरू असताना महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाच्या आमदारांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे आमदारांनी न्यायालयात धाव घेतली. याच न्यायालयाने आमदरांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले. तसेच उपाध्यक्षांवर विश्वास नसताना त्यांनी आमदारांवर अपात्रतेची नोटीस पाठवली. त्यामध्ये फक्त दोन दिवसांची मुदत दिली होती. कायद्यानुसार 7 दिवसांची मुदत देणे अपेक्षित होते. असेही जेठमलानी म्हणाले. तसेच राज्यपालांनी बुहमताची चाचणी घेण्याच्या निर्णयाने विधानसभा अध्यक्षांचे हात बांधले जात नाही.
सध्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सत्ता संघर्षावर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाखाली ही सुनावणी सुरू आहे. मात्र, ठाकरे गटाने या प्रकरणी 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाची मागणी केली आहे. त्यामुळे न्यायालयाने जेठमलानी यांना थांबवत घटनाक्रमा ऐवजी आपण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठ असावे की 7 न्यायमूर्तींचे घटनापीठ असावे याविषयी आपण चर्चा करूया. असे यावेळी सांगितले.
न्यायाधीशांनी सांगितल्यानंतर महेश जेठमलानी यांनी पुन्हा युक्तिवाद सुरू केला. त्यांनी मध्यप्रदेश सरकारच्या प्रकरणाचा यावेळी दाखला दिला. तसेच मध्यप्रदेशच्या केसचा दाखला देत याप्रकरणासाठी 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाची गरज नाही, असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला. जेठमलानी यांनी यावेळी आमदारांच्या जीवाला धोका, त्यांची सुरक्षा, उपाध्यक्षांच्या अपात्रतेचा मुद्दा, राज्यपालांचे अधिकार, इत्यादी मुद्द्यांवर युक्तिवाद केला.



