मुंबई : भाजपच्या राजकीय वर्तुळातून अडीच वर्षे पूर्णपणे बाजूला ठेवल्यानंतर आधी विधान परिषदेवरील आमदारकी आणि नंतर थेट प्रदेशाध्यक्षपद देऊन बावनकुळे यांच्यावर भाजपने विश्वास दाखविण्यात आला. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर बावनकुळे यांनी राज्याचा जोरदार दौरा केला. संघटनेत जीव ओतण्याचा आणि निवडणुकीसाठी तयार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला.
मात्र, या काळात चिंचवड आणि कोकण शिक्षकचा अपवाद वगळता इतर सर्व निवडणुकांमध्ये बावनकुळेंच्या नेतृत्वाखालील भाजपाला अपयश आल्याचे दिसत आहे. नाशिक, नागपूर, अमरावती व कोकण आणि मराठवाडा या दोन पदवीधर व तीन शिक्षक आमदारांच्या निवडणुका झाल्या. कोकण शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार निवडण्यापासून तो निवडून आणण्यापर्यंत सारे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे.
नाशिकमधील भाजपाने पाठिंबा दिलेले उमेदवार सत्यजीत तांबे स्वत:च्या तयारीवर निवडून आले आहेत. याउलट अमरावती पदवीधर व शिक्षक तसेच नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाला सपशेल अपयश आहे. विदर्भाचे नेते असलेल्या बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या सहा महिन्यांच्या काळात झालेल्या निवडणुकीत पक्षाला भरघोस असे यश मिळालेले नाही. नाशिकमध्ये तर पक्षाला स्वत:चा उमेदवार देता आला नाही. सत्यजीत तांबे यांनाही उघड पाठिंबा देता आला नाही. दुसरीकडे नागपूर शिक्षक मतदारसंघात नागो गाणार यांना भाजपाचा पाठिंबा असूनही त्यांचा पराभव झाला.
कसब्याच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत स्वत: बावनकुळे पुण्यात तळ ठोकून होते. भाजपाची राज्यातील मोठी टीम पुण्यात प्रचाराला होती. प्रचंड नियोजन आणि सारी यंत्रणा लावूनदेखील कसब्यात भाजपाचा मोठा पराभव झाला. कसब्यात मोठा विजय मिळवू असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला होता. मात्र, त्यांचे दावे आणि विश्वास वस्तुस्थितीपासून दूर असल्याचे कसब्यातील निकालावरून स्पष्ट झाले. या पराभवाने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. खरेतर मोठ्या वल्गना करणारे बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून घवघवीत यशापासून दूरच आहेत. त्यामुळे बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाला ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.



