रत्नागिरी : दरवाजे उघडेच ठेवा, सर्व बाहेर जाणार आहेत, तुम्ही दोघेच उरणार आहात, कारण तुम्ही शिवसेना कार्यकर्त्यांना मोठे होऊ दिले नाही, त्यांना संधी नाकारली अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत रविवारी खेड येथे केली.
उद्धव ठाकरे यांनी ५ मार्च रोजी खेडमधील ज्या गोळीबार मैदानावर सभा घेतली होती, तेथेच त्यांना उत्तर देण्यासाठी माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने रविवारी मुख्यमंत्री शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. शिंदे म्हणाले की, याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक आपटी बार येऊन गेला. पण मी त्यांना उत्तर द्यायला आलेलो नाही. गेले काही महिने त्यांचा एकच उद्योग चालू आहे. जागा बदलते. पण मुद्दे तेच असतात. त्यांचे शो राज्यभर चालू राहणार आहेत. ‘खोके’ आणि ‘गद्दार’ याशिवाय तिसरा शब्द त्यांच्या भाषणांमध्ये नसतो.
पण त्यांनी सत्तेसाठी हिंदूुत्व सोडले. बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष त्यांनी सत्तेसाठी गहाण ठेवला. बाळासाहेबांच्या विचारांशी बेइमानी केली. हिंदूुत्वाला डाग लावण्याचे काम केले. सत्तेसाठी भूमिका बदलली. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि धनुष्यबाण घेऊन पुढे चाललेलो आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे नाही, तर विचारांचे वारसदार आहोत. म्हणून नेहमी राज्याच्या हिताची भूमिका घेऊन आम्ही विकासासाठी काम करत राहणार आहोत असे शिंदे यांनी म्हटले आहे.



