मुंबई : भाषणात कोणी चुकूनही औरंगाबाद म्हटले तर खालून ‘संभाजीनगर’ म्हणा असे शिवसैनिक आवर्जून सांगतात. हिंदूत्व या मुद्दय़ावर महाविकास आघाडीतील मतभेदाचे मुद्दे कार्यकर्त्यांच्या पातळीवर आहेत. त्यात मालेगावरच्या सभेनंतर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांच्या अपमानाच्या मुद्दय़ाचा नव्याने समावेश झाल्यानंतर ‘महाविकास आघाडी’तील कार्यकर्त्यांमध्ये राजकीय मनोमीलन घडवून आणण्यासाठी केले जाणारे प्रयत्न यशस्वी होतील का, याविषयी शंका घेतल्या जात आहेत. मात्र, ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाची ताकद अधिक त्या जिल्ह्यात शिवसेना- राष्ट्रवादी व काँग्रेसमधील कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र ठेवणे हे तिन्ही पक्षांच्या नेत्यांसाठी अवघड काम असल्याचे दिसून येत आहे.
महाविकास आघाडीने सरकार तर एकत्रितपणे चालविले. मात्र जिल्हा, तालुका व गाव स्तरावरील कार्यकर्त्यांना ‘महाविकास आघाडी’ चा एकत्रित संदेश कधी दिला गेला नाही. करोनामुळे आणि नंतरच्या राजकीय घटनांमुळे जिल्हा स्तरावर सारे पक्ष आपापले कार्यक्रम स्वतंत्रपणेच आखत होते. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिका निवडणुकांमध्ये कार्यकर्ते एकमेकांविरोधात निवडणूक लढवितात. एखाद्या कार्यकर्त्यांस एका पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर तो अन्य पक्षातून लढतो.
त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणूक काळात ‘महाविकास आघाडी’ची वज्रमूठ बांधून ठेवण्यासाठी २ एप्रिलपासून राज्यात सहा ठिकाणी सभा होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील सभा पहिली असल्याने ती अधिक गर्दीची असावी असे प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहेत. या सभेच्या तयारीच्या बैठकीतच मनोमीलनातील मतभेदाचे मुद्दे चर्चेत आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण बोलण्यास उभे ठाकले आणि त्यांनी शहराचा उल्लेख ‘औरंगाबाद’ असा केला. त्यांनी जसे हे नाव उच्चारले तसे शिवसैनिक म्हणाले, ‘संभाजीनगर म्हणा’, त्यावर आमदार चव्हाण म्हणाले, तुम्ही अगदी अनेक दिवसापासून संभाजीनगर म्हणता. आता नाव तोंडात बसायला काही काळ लागेल. मग बोलताना ते पुन्हा औरंगाबाद म्हणाले. शिवसैनिकांनी त्यांना पुन्हा चूक दुरुस्त करण्याची सूचना केली. मग कधी संभाजीनगर, कधी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करत त्यांनी भाषण पूर्ण केले. शेवटी त्यांना बदल करण्यासाठी वेळ द्यायला हवा, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सांगावे लागले. आता या मुद्दय़ांमध्ये वीर सावरकरांच्या मुद्दय़ाची भर पडणार आहे. त्यामुळे मनोमीलनातील मतभेदाचे मुद्दे गाव स्तरावर कसे स्वीकारले जातात यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.



