मुंबई : राज्यातील सत्ता संघर्ष व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची दाखवलेली इच्छाशक्ती यामुळे राजकीय वातावरण गरम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याचे सूचक वक्तव्य केल्यामुळे त्यांचा नेमका रोख कुणाकडे आहे अशी चर्चा राजकीय वातावरणात सुरू झाले आहे. त्यातच खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री म्हणून पहावयाचे आहे असे वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत राजकीय चर्चांना वाचा फुटली आहे.
काही काळानंतर भाकरी ही फिरवावी लागते. ती जर फिरवली नाहीतर करपते. त्यामुळं भाकरी फिरवायची वेळ आता आली असल्याचं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. आता विलंब करुन चालणार नाही असंही ते म्हणाले. मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीनं युवा मंथन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं. पक्षसंघटनेत बदलाचे शरद पवारांनी यातून संकेत दिले आहेत.
यावेळी पवार साहेब यांनी सांगितले की, पक्ष संघटनेत काम करणाऱ्या युवकांची कशी वर्गवारी करायची ते ठरवा. वरच्या टप्प्यात कोणा-कोणाला आणायचे त्याचा विचार करा. जे अधिक काम करतील, त्यांना उद्या होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवीन नेतृत्व तयार केलं जाईल असे शरद पवार म्हणाले. त्यामुळं आता विलंब करुन चालणार नाही, भाकरी फिरवायची वेळ आली असल्याचे शरद पवार म्हणाले. ते काम पक्षामध्ये करायचा आग्रह संघटनेतील वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये
माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा आहे की, यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकद आजच्या तरुणांमध्ये असल्याचे शरद पवार म्हणाले. मुंबई शहरात कार्यकर्त्यांची कमतरता नाही. मुंबई ही कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलत आहे पण इथले सामान्य कुटुंब टिकले पाहिजे. गिरणी कामगारांची मुंबई आपण पाहिली आहे. तेव्हा कष्टकरी हा मोठा वर्ग होता.
आज तो कष्टकरी दिसत नाही. याठिकाणी असलेल्या गिरण्या गेलेल्या दिसतात. तिथे मोठमोठ्या इमारती दिसतात. तसेच गिरणीत काम करणारा कष्टकरी कुठे आहे ते माहित नाही. या कष्टकरी वर्गाचा शोध घ्यावा लागेल. घाम गाळण्याची संधी त्याला देण्यासाठी चित्र तयार करावे लागेल. तो बदल करण्यासाठी धोरणात बदल करावे लागतील. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निर्णय घ्यावे लागतील. या प्रक्रियेत नव्या पिढीला प्रोत्साहित करून संधी देऊ. नवीन नेतृत्व तयार करून राज्याचा चेहरा बदलण्यासाठी आमचा युवक पुढे येतोय असा इतिहास निर्माण करु असे पवार म्हणाले.



