पुणे : राज्यातील ३०८ गृहनिर्माण प्रकल्पांवर दिवाळखोरीची टांगती तलवार असल्याची धक्कादायक बाब ‘महारेरा’ने उघडकीस आणली आहे. विविध बँका, वित्तीय संस्था आणि पतपुरवठा करणाऱ्या इतर घटकांकडून राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणामार्फत या ३०८ प्रकल्पांवर दिवाळखोरीची कारवाई सुरू केलेली आहे.
राज्यातील गृह प्रकल्पांच्या सूक्ष्म संनियंत्रणासाठी ‘महारेरा’कडून पावले उचलली जात आहेत. त्यासाठी महारेराने विकासकांना त्यांची माहिती ठरावीक कालावधीनंतर ‘महारेरा’च्या संकेतस्थळावर अद्ययावत करणे अनिवार्य केले आहे; तसेच इतर स्त्रोतांमधूनही प्रकल्पस्थिती समजून घेतली जात आहे. अशी छाननी करताना राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या संकेतस्थळावर या गृहनिर्माण प्रकल्पांची प्रकरणे प्रलंबित असल्याचे दिसून आले. गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी ‘महारेरा’ने संबंधित गृहनिर्माण प्रकल्पांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
कोठे, किती प्रकल्प?
– मुंबई महानगरातील २३३, पुणे जिल्ह्यातील ६३, नगरचे पाच, सोलापूर चार आणि रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि सांगली येथील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.
– राज्यातील ३०८ प्रकल्पांपैकी ११५ प्रकल्पांचे बांधकाम सुरू असून, १९३ प्रकल्पांचे काम पूर्ण होण्याची मुदतही उलटली आहे. मात्र, अद्याप ते पूर्ण झालेले नाही.
नागरिकांकडून खरेदी
बांधकाम सुरू असलेल्या ११५ प्रकल्पांपैकी ३२ प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. मुदत उलटलेल्या १९३ प्रकल्पातील १५०प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त नोंदणी झालेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी संबंधित प्रकल्पांमध्ये फ्लॅटची खरेदी केली असल्याचे दिसून येते.




