
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. तसेच, काही ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ते अडचणीतही आले आहेत. आता पुन्हा एकदा संतोष बांगर चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या बाजार समिती निवडणुकांबाबत संतोष बांगर यांनी मोठी घोषणा केल्याचा केली होती. त्यांच्या या घोषणेचा व्हिडीओ निवडणुकीच्या निकालांनंतर व्हायरल होऊ लागला आहे.
निवडणुकीच्या आधी संतोष बांगर म्हणाले होते की, “कळमनुरीत राष्ट्रवादी, उरलेली शिवसेना, काँग्रेस, वंचित हे सगळे एक झाले आहेत. पण आजही सांगतो, नागनाथाचं मंदिर समोर आहे. १७ पैकी १७ जागा जर निवडून नाही आल्या, तर हा संतोष बांगर मिशा ठेवणार नाही”, असं आव्हान संतोष बांगर यांनी विरोधकांना दिलं होतं. त्यानंतर कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आता हाती आला असून १७ पैकी फक्त ५ जागा निवडून आणण्यात संतोष बांगर यांना यश आलं आहे. त्यावरून आता खोचक टीका-टिप्पण्या समोर येऊ लागल्या आहेत.



