मुंबई : शिवसेना भवन येथे ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना संबोधित करताना सत्तासंघर्षाच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत देऊन या निकालातील महत्त्वाचे मुद्दे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून संभ्रम दूर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात त्यामुळे तयार रहा, गाफील राहू नका, असे आदेश पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिले आहेत.
सेना भवन येथील बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्माण झालेले जिल्हाप्रमुखांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात आले असून आता राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याची जबाबदारी या जिल्हाप्रमुखांकडे असणार आहे. तर 18 जून रोजी मुंबईतील वरळी एनएससीआय डोम येथे भव्य पदाधिकारी मेळावा ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आला आहे. 19 जून रोजी षण्मुखानंद सभागृहात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.



