पुणे : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातील भारत राष्ट्र समिती अर्थात ‘बीआरएस’ या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडी घेतली आहे. यासाठी ‘बीआरएस’ने राज्यात मोठी मोर्चे बांधणी करण्यास सुरवात केली असून मराठवाड्यासह सोलापुरातील शेकडो कार्यकर्त्यांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला.
आज अहमदनगरच्या श्रीगोद्यातील राष्ट्रवादीचे नेते घनशाम शेलार यांनीही बीआरएसमध्ये जाहिर प्रवेश केला. ‘बीआरएस’ने आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, आता ‘बीआरएस’वर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला असून महाराष्ट्रात ‘बीआरएस’चे कल्चर टीकणार नाही, असा टोला लगावला. एका वृत्तवाहीनीशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेशासाठी होत असलेल्या गर्दीचे कारणही सांगितले आहे.
यावेळी त्यांनी ‘बीआरएस’ पक्षावर मोठे आरोपही केले. रोहित पवार म्हणाले, “‘बीआरएस’मध्ये सध्या महाराष्ट्रातील अनेक लोकं प्रवेश करत आहेत. पण बाहेरचे लोकं महाराष्ट्रात आले तर त्यांना महाराष्ट्राचे विचार कळणार नाहीत. ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केलेल्या एका पदाधिकाऱ्याला एका महिन्याला तब्बल तीन लाख रुपये पॅकेज असून महाराष्ट्रात हे कल्चर फार काळ टीकणार नाही”, असा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.


