मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. अजित पवार यांनी पक्षाच्या चिन्हावर दावा केल्याची माहिती का देण्यात आली नाही? असा सवाल शरद पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केला आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगानं देणं अपेक्षीत होतं असं शरद पवारांनी पत्रात म्हटलं आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी होण्याच्या आधी त्यांनी निवडणूक आयोगाकडे कागदपत्रं पाठवली आहेत. यामध्ये अजित पवारांनाच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शरथ घेतली. त्यांच्यासह आठ जणांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 30 जून रोजीचे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे. त्यामध्ये पक्षावर दावा करण्यात आला आहे.
- 2024 मध्ये बदल नक्कीच दिसेल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अध्यक्ष आहे. कोणी काहीही बोलू शकतं. कार्यकारिणी समितीची बैठक नियमानुसारच झाली. मला थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी 82 वर्षांचा आहे की 92 वर्षांचा आहे याने काही फरक पडत नाही. आता मी जास्त जोमाने कामाला लागणार असलयाचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचा दावा केला. पक्षाचं नाव आणि चिन्ह आपल्यालाच मिळावं यासाठी अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात पवार बोलत होते. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास आहे. कुणी काही नियुक्त्या केल्या त्यात काही तथ्य नाही. कोणाला काही व्हावंसं वाटणं याच्याशी मला देणंघेणं नाही. भाजप प्रतिस्पर्ध्यांवर दबाव आणण्यासाठी ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर होतो आहे. जे चुकीच्या रस्त्याने गेलेत त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल. 2024 मध्ये बदल नक्कीच दिसेल असेही शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादीच्या चिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगात
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. आपल्याला पक्षातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.



