मुंबई: महाराष्ट्रात अजित पवार यांच्या बंडामुळे राजकीय भूकंप पाहायला मिळाला. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. शरद पवार यांचे विश्वासू आणि पहिल्या फळीतील दिग्गज नेते अजित पवार यांच्या सोबत सत्तेत सामील झाले. एकूण 9 जणांनी मंत्रिपदाची शपथही घेतली. त्यानंतर दादांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ या चिन्हावर दावा केला. अजित पवार यांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष पाहायला मिळणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला उद्वव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाहीये. काल विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथी सुरुच असताना त्रिपुरा राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. त्रिपुरात विधानसभा अध्यक्षांनी एकूण 5 आमदारांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे
यामुळे राजकीय विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. त्रिपुरात शुक्रवारी 7 जुलै रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशेनाला सुरुवात झाली. या पहिल्याच दिवशी फुल्ल राडा झाला. भारतीय जनता पार्टी आणि तिप्रा मोठा पार्टी आमदार एकमेकांना भिडले. रस्त्यावर ज्या प्रकारे राडा होतो, त्याचप्रमाणे हे दोन्ही पक्षांचे आमदार आपआपसात भिडले. आमदार विधानभवनात टेबलवर चढून घोषणाबाजी करु लागले. फक्त एकमेकांची डोकी फोडायची बाकी राहिली होती. या सर्व प्रकरणानंतर एकूण 5 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
नक्की प्रकरण काय?
आता हे दोन्ही पक्षाचे आमदार आमनेसामने का आले, नक्की काय झालं? हे आपण जाणून घेऊयात. मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली. विरोधीपक्ष नेता अनिमेश देबबर्मा यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि वादाला तोंड फुटलं. विधानसभेत बागबासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जादब लाल नाथ हे अश्लिल चित्रफीत पाहत होते. या मुद्द्यावरुन देबबर्मा यांनी प्रश्न उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांनी या प्रश्नाला महत्व न देता प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करावी, असं म्हटलं. यामुळे देबबर्मा यांचा पारा चढला. देबबर्मा यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. घोषणेबाजीचं रुपांतर राड्यात झालं. आमदार आक्रमक झाले. काही आमदार हे टेबलवर चढले आणि विरोध करायला लागले



