गडचिरोली : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच राज्य सरकारच्या “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थिती दर्शवली. गडचिरोलीत “शासन आपल्या दारी” या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी नागरिकांना संबोधित करताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. सरकार हे जनतेसाठी असे म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत, त्यांचे हेलपाटे कमी व्हावेत आणि लाभ हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा, याच दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महायुती सरकारचं आजचा हा कार्यक्रम आहे.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शासनाचा पहिला महत्त्वाचा कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात पार पडतोय. यावेळी उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो.
देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आगेकूच करतोय. गेली ९ वर्षे देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता मोदी साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी काम करत आहेत.
अशावेळेस केंद्र सरकार व राज्य सरकार एकाच विचाराचं असलं तर केंद्रासह राज्याच्या योजना जनतेपर्यंत पोहोचणं सुकर होतं. त्यामुळेच आज अनेक उद्धाटनं पार पडली, असे अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.
ही उद्धाटनं पार पडत असताना मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शासकीय वसतिगृह आणि शासकीय निवासी वसतिगृह, निवासी शाळा इमारतीचं बांधकाम २५ कोटी रुपये खर्चून उभं करण्यात आलं. मुरमगाव येथे अडीच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राचं ऑनलाइनच्या माध्यमातून उद्धाटन झालं. त्याचबरोबर, येथील विकास कामांचा पाढाच अजित पवार यांनी वाचून दाखवला.



