खालापूर : खालापूर येथील इर्शाल गडावरील चौक गावापासून सहा किलोमीटर डोंगर भागात आदिवासी वस्तीवर दरड कोसळल्याने भयंकर दुर्घटना घडली आहे. रात्री गावातील लोक झोपलेले असतानाच डोंगर कडा तुटल्याने संपूर्ण गाव या डोंगर कड्याखाली दबला गेला.
या दुर्घटनेत आतापर्यंत चारजणांचा मृत्यू झाला आहे. तर दरडीखाली 50 ते 60 घरे आणि तब्बल 100 ते 200 लोक दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 25 लोकांना या दरडीखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे.
काल रात्री 10.30 ते 11 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. 250 ते 300 लोक वस्तीचं हे गाव आहे. आदिवासी ठाकूर समाजाची ही वस्ती आहे. गेल्या दोन दिवसांपासून या परिसराला पावसाने चांगलेच झोडपले होते. काल रात्री सर्वजण झोपेत असताना अचानक दरड कोसळल्याने या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली गेली आहेत. रात्री हा प्रकार घडल्याने एनडीआरएफची दोन पथके, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांनीही रेस्क्यू टीमला मदतकार्यात मदत केली.



