इतिहासात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. आज 9 ऑगस्ट, म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन आहे. भारताच्या इतिहासात 9 ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपलं शेवटचं स्वातंत्र्य युद्ध ‘भारत छोडो’, ‘चले जाव’ आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली होती. जी आज ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखली जाते. आजच्या दिवशी अमेरिकेने जपानच्या नागासाकी या शहरावर दुसरा अणुबाँब टाकला होता. सिंगापूर देश आजच्या दिवशी स्वतंत्र झाला. या व्यतिरिक्त आजच्या दिवसाचं महत्त्व काय हे आपण जाणून घेऊया.
1942 : ऑगस्ट क्रांती दिन (August Kranti Din)
क्रांती दिन हा भारताच्या इतिहासातला एक फार महत्वाचा दिवस आहे. 8 ऑगस्ट 1942 साली काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ आंदोलन सुरु केलं. ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आंदोलन सुरू केलं होतं. गांधीनी देशाला ‘करो या मरो’चं आवाहन केले. भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती.चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींसह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी ‘9 ऑगस्ट’ हा ‘ऑगस्ट क्रांती दिवस’ म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली वाहून, देशाच्या एकतेची भाषणं आणि इतर कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
भारत छोडो आंदोलनाच्या सुरुवातीला महात्मा गांधीनी मुंबईच्या गोवालिया टँक येथून भाषण दिल्याने या मैदानालाही ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी देशाला आवाहन करण्यासाठी महात्मा गांधी आणि इतर नेते 8 आणि 9 आॉगस्ट 1942 रोजी गोवालिया मैदानात एकत्र जमले होते.या ऐतिहासिक क्षणांची आठवण करुन देणाऱ्या या मैदानावर स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे.
सध्या या मैदानाचं रुपांतर पाच विभागणी असलेल्या मोठ्या मैदानात झालं आहे. एक विभाग हा शहीदांच्या स्मारकांचा आहे. सगळ्यात मोठ्या भागात खुल्या खेळाचं मैदान, त्याचबरोबर जेष्ठ नागरिकांसाठी गार्डन आणि लहान मुलांसाठी छोटंसं खेळाचं मैदान आहे. गांधी ज्या मणीभवनाचा वापर मुख्यालय म्हणून करत होते त्यापासून जवळच हे मैदान आहे. हे मैदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तसेच एका महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणाचा भाग आहे, परंतु दुर्दैवाने इतिहासाची माहिती देणाऱ्या पुस्तकात त्याचा उल्लेख नाही.


