धाराशिव : अजित पवार यांच्या गुप्त भेटीबाबत आपल्याला माहिती नाही. जरी अशी भेट झाली असेल तर त्यात काहीच वावगे नाही. एवढ्या वर्षाचे कौटुंबिक संबंध थोडेच संपणार आहेत? अजित पवार यांनी वेगळी वैचारिक भूमिका स्वीकारली म्हणून त्यांच्यासोबत सतत भांडण करायला हवे काय? वैचारिक विरोध असला तर संवाद बंद होता कामा नये. शरद पवार यांचा संवादावर विश्वास आहे. त्यामुळे एखाद्या गटावर ऊर्जा खर्च करीत बसण्यापेक्षा भाजपाला टार्गेट करण्याचे आम्ही ठरवले आहे. आणि हाच संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण मराठवाडा दौऱ्यावर असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर, जीवन गोरे, माजी आमदार राहुल मोटे, संजय निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ज्यांनी घर फोडले, ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्याविरोधात प्रखर भूमिका घेणार आहोत. भाजपावर संवैधानिक बॉम्ब फेकल्यावर त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आपोआप नेस्तनाबूत होतील असा दावाही रोहित पवार यांनी केला. धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोग्य खात्यातील रखडलेल्या भरती प्रक्रियेबद्दल पवार यांनी परखड शब्दात टीका केली. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात रोष आहे. त्यामुळे शिंदे गटातील १५ आमदार परत उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत आहेत. सध्या तशी बोलणी सुरू आहे. मात्र उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेणार का हे काळच ठरवेल. एकंदरीत राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सरकार धास्तावले आहे. लोकांच्या हिताचे प्रश्न घेऊन लढण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे यासाठी स्वहित बाजूला ठेवून संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हा हाच संदेश साहेबांनी दिला आहे. तोच सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण मराठवाडा दौऱ्यावर असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.



