कराड : – कराड तालुक्यातील उंब्रज गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या भराव पूल असून त्याठिकाणी सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल होणे अत्यावश्यक असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे उंब्रज परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यावरुन आमदार चव्हाण यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवुन फोनवरून सेगमेंटल उड्डाण पूल होण्याची गरज सांगून चर्चा केली होती. त्यावरुन मंत्री गडकरी यांनी सेगमेंटल पुलाची व्यावहारिकता तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.कऱ्हाड व मलकापूर येथील जुना भराव उड्डाण पूल पाडून नवीन सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल बांधण्याची प्रक्रिया आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातुन सुरु आहे. त्यासाठी जुना भराव उड्डाण पूल पाडला असून नवीन पूल बांधण्याचे काम सुरु आहे.
याच धर्तीवर उंब्रज येथील जुना भराव उड्डाण पुलामुळे उंब्रजचे दोन भाग झाले असून पुलाच्या बाजूला अरुंद सेवा रस्ता झाला असून येथे नित्याचीच वाहतूक कोंडी होत आहे. उंब्रज येथील बाजारपेठेचे नुकसान यामुळे होत आले आहे. भराव पुलामुळे उंब्रज गावचे दोन विभागात तुकडे झाल्यानंतर या ठिकाणच्या बाजारपेठेवरती खूप मोठा परिणाम झाला होता. जेव्हा महामार्गाचे विस्तारीकरण झाले तेव्हा स्थानिक नागरिकांनी पारदर्शक उड्डाणपुलाला विरोध केला होता मात्र ती झालेली चूक उंब्रज गावाच्या नागरिकांची डोकेदुखी बनली होती. अखेर ती चूक सुधारण्याची संधी नव्याने चालून आली आहे.
पुणे बेंगलोर महामार्गावर असलेला उंब्रज एसटी बस स्थानक वापरा अभावी पडून आहे. तेथील नागरिक बससाठी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वाट पहात उभे राहतात. त्यामुळे अपघातांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनी आमदार चव्हाण यांच्याकडे तेथे सेगमेंटल उड्डाण पूल बांधण्याची मागणी केली होती. त्यावरुन आमदार चव्हाण यांनी मंत्री गडकरी यांना ई मेल द्वारे पत्र पाठवून फोनवरूनही त्यासंदर्भात चर्चा केली. त्यानुसार मंत्री गडकरी यांनी आमदार चव्हाण यांच्या पत्राला उत्तर देत उंब्रज येथील पुलाची व्यवहारिकता तपासून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले आहे.



