लोकसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपाने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मात्र जागावाटपावर अद्याप तोडगा गाढता आलेला नाही. महाविकास आघाडीच्या शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपावर चर्चा चालूच आहे.
दरम्यान, एकीकडे ही चर्चा चालू असताना प्रकाश आंबेडकरांनी वेगळी भूमिका घेतली आहे. मविआसोबत आपली पूर्णपणे युती झालेली नाही. त्यामुळे राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मविआने बोलावलेल्या बैठकींना जाऊ नये, असा आदेश प्रकाश आंबेडकरांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय. यावरच ठाकरे गटाचे नेत तथा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
“प्रकाश आंबेडकरांनी हुकूमशाहीचा…”
संजय राऊत प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर बोलताना म्हणाले की, आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना इकडे जाऊ नका आणि तिकडे जाऊ नका असे सांगावे लागत नाही. आंबेडकरी जनतेची एक भूमिका आहे. या वेळी प्रकाश आंबेडकरांनी हुकूमशाहीचा पराभव करण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीसोबत जायला हवं, अशी भावना राज्यभरातील लोकांची आहे.



