
मुंबई : महाविकास आघाडीने दिलेला लोकसभेच्या तीन जागांचा प्रस्ताव फेटाळल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. संजय राऊत यांनीही वंचित आणि ‘मविआ’मध्ये सहमती होण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. दुसरीकडे, ‘मविआ’तील तीन प्रमुख पक्षांतही जागावाटपावरून मतभेद कायम असून शरद पवार यांच्या निवासस्थानी चर्चेतही तोडगा निघाला नसल्याचे समजते.
गत लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मतविभागणी केल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला काही जागांवर पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या दोघांसह शिवसेना-उद्धव गटाच्या ‘मविआ’मध्ये वंचितलाही स्थान देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रकाश आंबेडकरांशी आघाडीबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सुरुवातीपासूनच साशंक होते. वंचित स्वतंत्र लढल्यास किती नुकसान होऊ शकते याचा आढावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. काही मतदारंसघांमध्ये फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तविली जाते.
महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रकाश आंबेडकर यांनी बरोबर यावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. पण वंचितच्या वतीने चर्चेला वेगळेच वळण दिले जात असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. तर, महाविकास आघाडीने अकोल्यासह तीन जागांचा प्रस्ताव आम्हाला दिला होता. तो आम्ही प्रस्ताव फेटाळल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तसेच वंचितने सहा जागांची मागणी केलेली नाही, असा खुलासाही करण्यात आला. वंचितला तीन जागा देण्याची महाविकास आघाडीची तयारी होती. पण वंचितने त्याला नकार दिल्याने त्यांची त्यातून भूमिका स्पष्ट होते, असे खासदार संजय राऊत यांनी म्हणणे आहे.



