
नवी दिल्ली: निवडणूक आयोगामध्ये दोन नवे निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार व सुखबीरसिंग संधू यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची विनंती करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यास त्यामुळे गोंधळ व अनिश्चिततेचे वातावरण तयार होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
याप्रकरणी केंद्राने सहा आठवड्यांच्या आत आपले उत्तर सादर करावे अशी नोटीस न्यायालयाने बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ५ ऑगस्ट रोजी होणार आहे.
‘देशाला आजवर उत्तम निवडणूक आयुक्त मिळाले’
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, निवडणूक आयुक्त हे स्वतंत्र व निष्पक्षपाती हवेत यात शंका नाही. स्वातंत्र्य प्राप्तीपासून देशाला अतिशय उत्तम निवडणूक आयुक्त लाभले आहेत. याआधी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कार्यकारी मंडळाकडून व्हायची. पण, आता त्यांच्या नियुक्तीसाठी कायदा करण्यात आला आहे.




