शिवसेना शिंदे गटाने हिंगोलीसाठी हेमंत पाटील यांची उमेदवारी जाीहर केली. त्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या शेवटची दिवशी उमेदवारी रद्द केली. यवतमाळ-वाशिममध्येही संजय राठोड की भावना गवळी हे ठरत नसताना हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर आता उबाठा गटाकडून जोरदार टीकास्र सोडण्यात येत आहे.

 

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले की, भाजपाने शिंदे गट आणि अजित पवार गटाला ताटाखालचे मांजर बनवून ठेवले आहे. दोन्ही गटाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. जे भाजपा म्हणेल, तेच या लोकांना करावे लागेल. एखाद्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्याच पक्षाने ठरवावा, असे कधीही महाराष्ट्रात झाले नव्हते.

 

अंबादास दानवे पुढे म्हणाले, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेतृत्व करत होते, त्यावेळेस आमचे उमेदवार बदलण्याची हिंमत भाजपाने कधीही केली नाही. जागावाटप हे पक्षाचे होत असते त्यांनी त्यांचा-त्यांचा उमेदवार ठरवायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असते, परंतु भाजपाने आता ही नवीनच नीती अवलंबली आहे.