मुंबई : मी एकटा आणि तुम्ही तिघेजण चर्चेसाठी या असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना चॅलेंज दिलं आहे. फक्त 3 प्रश्नावर आपण बसून चर्चा करु असे आदित्य ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसह भाजपवर जोरदार टीका केली. नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे ते पाहुयात.
आदित्य ठाकरेंचे तीन प्रश्न कोणते?
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तीन प्रश्नावर चर्चा करण्याचे चॅलेंज दिलं आहे. हे तीन प्रश्न नेमके कोणते असा सर्वांनाचं प्रश्न पडला असेल तर पहिला प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग गेले यांसंदर्भात चर्चा करु. दुसरा प्रश्न म्हणजे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत याबाबत चर्चा आणि तिसरा प्रश्न म्हणजे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिला. या तिन्ही मुद्यावर खुल्या चर्चेचं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले. मी बिना पेपर चर्चा करायला तयार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही लगावला टोला
शेतात हेलिपॅड असणारे राज्यातील एकमेव शेतकरी म्हणजे एकनाथ शिंदे आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. ते फक्त दोनच दिवस शेती करतात, एकदा अमावस्येला आणि एकदा पोर्णिमेला असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
कोरोनाच्या संकटात राजकारण करणारा भाजप हा जगातील एकमेव पक्ष
कोरोनाच्या काळात भाजप हा जगातला एकमेव पक्ष होता जो राजकारण करत होता असे आदित्य ठाकरे म्हणाले. काही दिवसांसाठी चोरांच्या हातात धनुष्यबाण गेला आहे. सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. आमचा धनुष्यबाण आम्ही तिथून मिळवू असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यावेळची भाजप वेगळी होती. पण आजची भाजप वेगळी असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आमचं मशाल हे चिन्हे सर्वत्र पोहोचलंय, हीच मशाल देशातला अंधकार दूर करणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
![](https://ejanashakti.com/wp-content/uploads/2023/03/Screenshot_20240711_092011_Facebook.jpg)