इंदापूर :उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये मंगळवारी वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडून सहा जण बेपत्ता झाले होते. २० तासांच्या शोधानंतर त्यातील पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. दुसरीकडे आता अहमदनरगमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नदीत बुडालेल्या लोकांच्या शोधासाठी चालवण्यात आलेली बोट बुडाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरु आहे.
अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील प्रवरा नदीत एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून तिघांचा शोध सुरु आहे. प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफचे पथक आणि एक स्थानिक असे एकूण सहाजण बोटीतून गेले होते. मात्र बोट उलटल्याने तीन जवानांचा मृत्यू झाला तर तिघे बेपत्ता झाले आहेत.
नगरच्या अकोले तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफ पथकातील सहा जण गुरुवारी सकाळी बुडाले. सुगाव बुद्रुक शिवारात बुधवारी वनविभागाच्या रोपवाटिके जवळपास प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी पाण्यात दोन तरूण पाण्यात बुडाले होते. त्यातील एकाचा मृतदेह सापडला तर दुसर्याचा शोध सुरू होता. तरुणाच्या शोधासाठी धुळ्याहून आलेले राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक गुरुवारी सकाळी दोन बोटी घेऊन नदीपात्रात उतरले होते.
मात्र नदीपात्रात मोठा भोवरा व खड्डा असल्याने यात एसडीआरएफची एक बोट पलटी होऊन शोध पथकातील पाच आणि एक स्थानिक असे सहा जण बुडाले. यातील पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील एक पंकज पवार सुखरूप असल्याचे समजते. दुसरा अशोक पवार अत्यावस्थ असून भांडकोळी रूग्णालयात उपचार घेत आहे. तर प्रकाश नामा शिंदे, वैभव सुनील वाघ, राहुल गोपीचंद पावरा या एसडीआरएफच्या तीन जवानांचे मृतदेह मिळाले आहे. पाण्यात बुडालेला स्थानिक गणेश मधुकर देशमुख – वाकचौरे याचा व काल बुडालेला अर्जुन रामनाथ जेडगुले याचा देखील प्रशासनाकडून शोध सुरू आहे.



