मुंबई : मुंबईतील पूर्व उपनगरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विक्रोळी परिसरात इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या इमारतीत ही दुर्घटना घडली ती इमारत म्हाडाची आहे.
पूर्व उपनगरातील विक्रोळी पूर्व परिसरात म्हाडाच्या 40 क्रमांक इमारतीचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळल्याने दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, या दोघांचाही मृत्यू झाला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोन्ही जखमी व्यक्तींचा मृत्यू झाल्याचं न्यूज एजन्सी एएनआयने म्हटलं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी (30 मे 2024) संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. विक्रोळीतील म्हाडाच्या 40 क्रमांकाच्या इमारतीतील एका घराचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत दोन नागरिक जखमी झाले. या दोघांनाही उपचारासाठी जवळच असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला. सूर्यकांत म्हादळकर आणि शरद म्हसाळ अशी मृतकांची नावे आहेत.
ज्या इमारतीत ही दुर्घटना घडली आहे ती इमारत किती वर्षे जुनी आहे? तसेच इमारत ही धोकादायक स्थितीत आहे का? या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे चिंता वाढली आहे. दुर्घटना घडलेली ही इमारत म्हाडाची असल्याने म्हाडाच्या जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेवर म्हाडाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.
मुंबई मनपाकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर
पावसाळा आल्यावर मुंबई महानगरपालिकेकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. तसेच या धोकादायक इमारती नागरिकांनी रिकाम्या करुन इतरत्र स्थलांतरीत होण्याच्या सूचना सुद्धा मनपा कडून देण्यात येत असतात. यंदाच्या वर्षी सुद्धा मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या यादीत 188 धोकादायक इमारतींचा समावेश आहे. या इमारतीमधील नागरिकांना घरे रिकामी करण्याच्या नोटीस सुद्धा बजावण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळणे, इमारत कोसळणे किंवा मोडकळीस आलेल्या चाळींचा काही भाग कोसळून दुर्घटना होत असतात. या दुर्घटना होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर करुन नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात येत असतात.



