
नवी दिल्ली: नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यासाठीची तयारी दिल्लीत सुरु आहे. राजधानीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानं, पक्षाच्या ६३ जागा घटल्यानं भाजपचं सरकार मित्रपक्षांच्या मदतीवर उभं राहतंय. त्यामुळे एनडीएतील घटकपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. संभाव्य मंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन गेले आहेत. नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, एच. डी. कुमारस्वामी, चिराग पासवान, जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल यांना पंतप्रधान कार्यालयाकडून फोन गेलेले आहेत. राज्यातील सहा खासदारांना मंत्रिपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. यामध्ये पियूष गोयल, नितीन गडकरी, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह शिंदेसेनेच्या प्रतापराज जाधव आणि आरपीआयच्या रामदास आठवलेंचा समावेश आहे. या सहा खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून फोन गेले आहेत.
- आठवलेंना मंत्रिपदासाठी फोन पण राष्ट्रवादीच्या कोणालाही फोन नाही
महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिपद मिळण्याची शक्यता अतिशय धूसर आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांचं नाव चर्चेत होतं. पण त्यांना पीएमओकडून फोन आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या ४ जागा लढवल्या. पैकी एक जागाच त्यांना जिंकता आली. अजित पवारांना त्यांच्या बारामतीमध्ये स्वत:च्या पत्नीलादेखील निवडून आणता आलेलं नाही. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाचा महायुतीला नेमका काय उपयोग असा सवाल भाजपचे पदाधिकारी खासगीत विचारत आहेत. आठवलेंना मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे. पण राष्ट्रवादीच्या कोणालाही फोन गेलेला नाही. यातून भाजप नेतृत्त्वानं अजित पवारांना योग्य तो संदेश दिल्याचं बोललं जात आहे.
