
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाची दोन शकलं झाली. अजित पवार यांनी मूळ पक्षावर दावा केला तर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार नावाने पक्ष पुढे न्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या उघड उघड वाद होताना दिसत आहे. शरद पवार यांच्यासाठी ही नवी डोकेदुखी आहे.
राष्ट्रवादीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जयंत पाटील यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. मात्र पक्ष संघटनेत काम करण्यावरुन जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या संघर्ष होताना पहायला मिळत आहे. जयंत पाटील यांच्या न ऐकण्याच्या भूमिकेमुळे रोहित पवार संतप्त झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत हा वाद आता आणखी चिघळताना पहायला मिळत आहे.
रोहित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जयंत पाटील यांना बदलण्याची मागणी केली होती. शशिकांत शिंदे आणि रोहित पवार यांच्याकडे पक्ष संघटनेची जबाबदारी द्यायला हवी, अशी उघड भूमिका त्यांनी मांडली. त्यानंतर या वादाने आणखीनच पेट घेतला. आता जयंत पाटील गटाच्या लोकांनी देखील यावर बोलण्यास सुरुवात केली आहे.
कोंबड्या सांभाळण्याइतकं सोपं नाही!
जयंत पाटील यांच्या जवळचे आणि पक्षाचे अधिकृत प्रवक्तेपद असलेल्या भूषण राऊत यांच्या वक्तव्याने या वादात तेल ओतण्याचं काम केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद हे कोंबड्या सांभाळण्याइतकं सोपं नाही, असं ट्वविट भूषण राऊत यांनी केलं आहे. रोहित पवार बारामती अॅग्रोच्या माध्यमातून पोल्ट्रीशी संबंधित व्यवसाय करतात, त्याला धरुन त्यांनी हे ट्विट केलं आहे. कोंबड्या साभाळणारे असं म्हणून त्यांनी एक प्रकारे रोहित पवार यांना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.



