
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच मुकाबला असणार आहे. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राज्यातील 11 जागांसाठी विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देताना अकरापैकी नऊ जागांवर विजय प्राप्त केला. दरम्यान, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने मोठा झटका बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आत्मविश्वासाने निवडणूकला सामोरे जाण्यासाठी मदत मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषद निवडणुकीसाठी अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे आमदार फुटतील अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना एकही आमदार फोडता आला नसल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची मते शाबित राहिली आहेत. त्यामुळे त्यांचे दोन्ही उमेदवार सहज विजयी झाले. दुसरीकडे भाजपचे सुद्धा पाच उमेदवार विजयी झाले.
विधानसभेला महाविकास आघाडीला पसंती
या सर्व पार्श्वभूमीवर आता सर्वांचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारने डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी लोकप्रिय घोषणा घोषणा केल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सुद्धा समावेश आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दैनिक ‘सकाळ’कडून आगामी निवडणुकीसाठी सर्वेक्षण करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्यात आला. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला पसंती दिल्याचे समोर आलं आहे. दरम्यान, या निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल असं सुद्धा म्हटलं आहे.
आगामी निवडणुकीमध्ये विधान परिषदेचा कॉन्फिडन्स महायुतीला मिळाला असला, तरी महायुतीसमोर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे कडवं आव्हान असेल यामध्ये शंका नाही. दरम्यान सकाळकडून करण्यात आलेल्या सर्वेनुसार येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली पसंती कोणाला असेल, या अनुषंगाने सर्वे करण्यात आला असता यामध्ये 48.7 टक्के लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली. महायुतीने 33.1 लोकांना पसंती दिली आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समान पातळीवर
यापैकी नाही असे 4.9 टक्के लोकांनी म्हटल आहे. अद्याप ठरलेलं नाही असं 13.3 टक्के लोकांनी म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीसमोर महाविकास आघाडीचे जोरदार आव्हान असेल, यामध्ये काही शंका नाही. दुसरीकडे मुख्यमंत्रीपदावरून सुद्धा सकाळकडून सर्वे करण्यात आला. यामध्ये 22.4 टक्के मते घेते समान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समान पातळीवर आहेत.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती 14.5 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. 10.2 टक्के लोकांनी काहीच सांगता येत नसल्याचे सांगितले. सुप्रिया सुळे यांना 6.8 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. बाळासाहेब थोरात यांना 4.4 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. अजित पवार यांना 5.3 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. नाना पटोले यांना 4.7 टक्के लोकांनी पसंती दिली आहे, तर जयंत पाटील यांना 3.6 टक्के लोकांनी पसंती दिली आहे.



