![]()
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी (15 जुलै) मोठ्या उत्साहात पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी प्रशासनाकडूनही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसंच आरोग्य विभागाच्या वतीनं देखील भाविकांसाठी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. बाजीराव विहीर येथे संपन्न झालेल्या या रिंगण सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अश्वानं दोन फेऱ्या मारल्यानंतर माऊलीच्या अश्वाच्या खुरानं उधळलेली माती आपल्या कपाळा लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
सर्व दिंड्या माऊलीच्या पालखीच्या पुढे भजन करत निघाल्या होते. फुगडी खेळत, मनोरे करून पखवाज वाजवत असे विविध खेळ खेळत वारकऱ्यांनी या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. तर आज (16 जुलै) रात्री सर्व दिंड्या पंढरपूरमध्ये येणार आहेत. बुधवारी पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करून आषाढी एकादशी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.



