संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची तहान भागवणारे उजनी धरण 86 टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे रविवारी (दि. 4) सायंकाळी पाच वाजल्यापासून विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
उजनी धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. उजनी धरण जलाशय 86 टक्के क्षमतेने भरला आहे. त्यामुळे पुरनियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रामध्ये रविवारी सायंकाळी पाच वाजता 20 हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. भीमा नदी काठच्या नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये. नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, असे आवाहन उजनी धरण पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.



