
बुलडाणा : उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल करताना हे सुपारीबाज सरकार असल्याची टीका केली. सुपारी गँग ही मंत्रालयात सहाव्या मजल्यावर बसते, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊतांनी केला. मातोश्रीवर आंदोलन करणारे आंदोलक हे एकनाथ शिंदे गटाचे असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मात्र खासदार संजय राऊत यांच्या टीकेला बुलडाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
गावगुंडांच्या सुपाऱ्या घेण्याचं काम मातोश्रीवरुन चालते, असा खरपूस समाचार संजय गायकवाड यांनी घेतला. सुपारीचं राजकारण हे पूर्वीपासूनचं मातोश्रीवरुन चालते. आम्ही घेतलेल्या सुपाऱ्या या महाराष्ट्राला प्रगतीकडं नेणाऱ्या आहेत. लाडक्या बहिणींना निधी देण्यासाठी आम्ही सुपाऱ्या घेतल्या. शेतकऱ्यांना योजना देण्यासाठी आम्ही सुपाऱ्या घेतल्या, असंही त्यांनी यावेळी ठणकावलं.
