पुणे : राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेची सध्या मोठी चर्चा सुरु आहे. याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत, तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा या योजनेचा निधी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवरच आज पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेमधून दिल्या जाणाऱ्या निधीबाबत मोठं विधान केलं. “सर्वांनी आशीर्वाद आणि बळ दिलं तर १५०० रुपयांचे ३००० होतील”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
“ज्यांनी-ज्यांनी कोवीडच्या काळातही सोडलं नाही. पुण्यात देखील काही कोवीड सेंटर्स उभे केले आणि खोटे रुग्ण दाखवले, खोटे डॉक्टर दाखवले. एवढंच नाही तर रुग्णांच्या तोंडची खिचडीही पळवली. त्यांना तुमच्या तोंडचा घास पळवायचा होता. आताही तुमच्या तोंडचा घास हिरवण्याचा प्रयत्न होत आहे. विरोधक लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले. पण मी तुम्हाला सांगतो की, आनंदाचा शिधा आपण दिवाळी दसरा आणि गणपतीमध्ये देतो. त्यामध्ये रवा, मैदा, साखर, तेल, डाळ असं सर्व असतं. त्याही विरोधात ते न्यायालयात गेले होते. विरोधक हे पाप कुठे फेडणार आहेत? मात्र, आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केला.



