: विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अनेक नेत्यांचे राज्यात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र, आता महायुतीमध्येही धुसफूस सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या टीकेनंतर महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
रामदास कदम यांनी म्हटलं की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी रविंद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा. तसेच ते अत्यंत कुचकामी मंत्री आहेत, असं रामदास कदम यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रामदास कदम वारंवार टोकाचं बोलतात, आमचंही मनं दुखावलं जातं. मग आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतील”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदम यांना खडेबोल सुनावले आहेत.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“रामदास कदम हे वारंवार अशा पद्धतीने टोकाचं बोलतात. त्यामुळे आमची मनंही दुखावली जातात. शेवटी आम्हीही माणसं आहोत. त्यांच्या विधानाला उत्तरादाखल बोलताना आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतील. पण जे मोठे नेते आहेत, त्यांनी काहीतरी पथ्य पाळलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाला वारंवार अशा प्रकारचं बोलणं आम्हाला मान्य नाही. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.



