सांगली : आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी महाविकास आघाडीने सुरु केलेली आहे. दरम्यान लोकसभेनंतर आता पुन्हा एकदा सांगलीमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा वाद उभा राहिला आहे. आटपाडी खानापूर मतदारसंघात शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना काँग्रेस पुरस्कृत अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी पाठिंबा दिल्यावरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभेत काँग्रेसने विश्वासघात केला तसाच विधानसभेतही होणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे सांगली जिल्ह्यात काँग्रेस बरोबर आघाडी करू नका अशी मागणी त्यांनी केली आहे.
संजय विभुते म्हणाले, ज्या विश्वासाने उद्धव ठाकरेंनी दिल्ली भेटीत विशाल पाटलांना माफ केले. त्यांचाच पुन्हा विश्वासघात करून खासदार विशाल पाटलांनी दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत हे सिद्ध केले. वरिष्ठांकडे वेगळी भूमिका मांडायची आणि जिल्ह्यात वेगळी भूमिका मांडायची हे उद्धव ठाकरेंना आम्ही समजून सांगणार आहोत. सांगली जिल्ह्यात आपला विश्वासघात झाला आहे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले पण पुढेही काँग्रेसकडून विधानसभेला विश्वासघात होणार आहे याचे संकेत विशाल पाटलांनी दिले आहेत, असा आरोप विभुते यांनी केला.
ते पुढे म्हणाले, आपला खरा शत्रू भाजपा-शिंदे गट आहे. पण त्यांच्याच व्यासपीठावर जात खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. माझी शिवसेना-काँग्रेसच्या वरिष्ठांना विनंती आहे आपण सांगली जिल्ह्यापुरती आघाडी करू नये. असाच पाठीत खंजीर खुपसणार असाल तर सांगली जिल्ह्यात आघाडी न केलेली बरी. त्यापेक्षा काँग्रेसने शिंदे गटाला जाहीर पाठिंबा देऊन टाकावा. ज्या विश्वासाचं राजकारण महाविकास आघाडी करतेय त्या विश्वासाला तडा देण्याचे काम खासदार विशाल पाटील करत आहेत, असंही जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी सांगितले.
दरम्यान, माझी पक्षाच्या वरिष्ठांना विनंती आहे. सांगली जिल्ह्यात काँग्रेसवर विश्वास ठेवून आपल्याला महाविकास आघाडीचे राजकारण करता येणार नाही. सांगली जिल्ह्याच्या आघाडीचा वरिष्ठांनी फेरविचार करावा अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे.



