सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसनेही जोरदार तयारी केली असून, केंद्रीय निरीक्षकांनी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. यामध्ये पदाधिकाऱ्यांनी माण, वाई आणि कराड दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्याची जोरदार मागणी केली. यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार कसा, असा प्रश्न निर्माण होणार आहे.
साताऱ्यातील काँग्रेस कमिटीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त निरीक्षक आणि कर्नाटकातील माजी मंत्री विनयकुमार सोरके यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, अजित पाटील, धनश्री महाडिक, रजनी पवार आदी उपस्थित होते.
यावर निरीक्षक सोरके यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवायचे असेल, तर घराघरांतील माणूस पक्षाशी जोडायला हवा. बूथ कमिट्या आणखी बळकट कराव्यात, अशी सूचना केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील तीन मतदारसंघ मिळण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडे प्रयत्न करण्यात येतील, असेही स्पष्ट केले.