: महाराष्ट्र विधासभा निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आली आहे. प्रचाराचा जोर सुरु झाला आहे. १५ ऑक्टोबरच्या दिवशी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. ही घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे. यानंतर महायुती सरकारने त्यांचं अडीच वर्षांचं रिपोर्ट कार्ड सादर केलं. विजय कुणाचा होणार? हा प्रश्न विचारला असता खासदार उदयनराजे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले उदयनराजे?
आम्ही आमचं काम करत आहोत. मी आणि शिवेंद्र राजे आम्ही अनेक कामं मार्गी लावली आहेत. आमचं काम हाच आमचा अजेंडा आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात मी फिरणार आहेच तसंच जिथे गरज लागेल तिथेही मी प्रचार करणार आहे असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.
- फुल स्विंगमध्ये महायुतीचं सरकार येईल?
महाराष्ट्रात कुणाचं सरकार येईल? असं विचारलं असता उदयनराजे म्हणाले, महाराष्ट्रात फुल स्विंग आणि फुल स्विपध्ये महायुतीचं सरकार येईल. विरोधक योजनांवर टीका करत आहेत कारण त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नाहीत. जर योजनांना हे नावं ठेवत आहेत तर त्यांनी त्या योजना का आणल्या नाही? स्वतः कुठल्या योजना आणायच्या नाहीत. दुसऱ्याने आणल्या तर त्याला नावं ठेवायची आणि टीका करत बसायची एवढंच यांना (विरोधक) जमतं असंही उदयनराजे म्हणाले. तसंच त्यांनी शरद पवारांबाबतही भाष्य केलं.
- शरद पवारांचे दौरे वाढले आहेत त्याचा त्यांनी विचार करावा
शरद पवारांचे पश्चिम महाराष्ट्रातले दौरे वाढले आहेत तर वाढू द्या. लोकशाही त्यांना दौरे काढण्याचा अधिकार आहे. मात्र दौरे का वाढले आहेत? याचा विचार त्यांनी केला पाहिजे. त्यांनी कामं केली का? ती केली असती तर इतके दौरे करावे लागले नसते. कृष्णा खोऱ्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, त्यावेळी शरद पवारांनी तो केला नाही? त्यांनी तो का केला नाही? शरद पवारांनी कामं केली असती तर त्यांना सांगता आली असती. ती नाहीत म्हणून त्यांना दौरे वाढवावे लागत आहेत. महायुतीने रिपोर्ट कार्ड आणलं आहे कारण महायुतीने कामं केली आहेत. यांनी काही कामंच केलेली नाहीत त्यामुळे हे टीका करत आहेत. असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.



