
महायुती की महाविकास आघाडी कोण बहुमत स्थापन करणार? यावर चर्चा झडत आहेत. तर काही जणांनी विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र आलेले पाहायला मिळू शकतात. त्यांच्या विधानावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी होकारार्थी प्रतिसाद दिला. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, त्याबरोबर आम्ही राहू, असे संजय शिरसाट यांनी जाहीर केले होते. त्यावर आता राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
संजय शिरसाट यांच्या विधानावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून काही दावा केल्यास त्यावर बोलता येईल. तीनही पक्षांचे प्रमुख नेते जे म्हणतात, तेच ब्रह्म वाक्य ठरते. बाकी नेते इकडे तिकडे जाण्याचे काही बोलत असतील तर त्यावर बोलणार नाही. पण ‘तिकडे’ही खूप अडथळे आहेत. तिकडे कुठे शरद पवार बसलेले आहेत तर कुठे उद्धव ठाकरे बसलेले आहेत. महायुती स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करेल.



