महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडली आहे. आता सगळ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे ती निकालांची. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये कुणाची सरशी होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निवडणूक पार पडल्यानंतर जे एक्झिट पोल समोर आले आहेत त्यांनी महायुतीची सत्ता येईल असं म्हटलं आहे. तर दोन ते तीन एक्झिट पोल्सनी महाविकास आघाडीची सत्ता येईल असं म्हटलं आहे. काय होतं ते २३ नोव्हेंबरला समजणार आहे. दरम्यान भाजपाचे खासदार आणि ज्येष्ठ नेत्याने शरद पवार महायुतीसह येऊ शकतात असा दावा केला आहे. त्यानंतर आता नेमकं काय होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना
महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पार पडला आहे. या सामन्यात विजयी कोण होणार? याचा निकाल २३ नोव्हेंबरला म्हणजेच आता काही तासांमध्येच लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना खिंडार पडलं आहे. यानंतर जी लोकसभा निवडणूक पार पडली त्यात महाविकास आघाडीला यश मिळालं. तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तास उरले आहेत. अशातच भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याने ( Narayan Rane ) शरद पवारही महायुतीसह येऊ शकतात असा दावा केला आहे.



